‘शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या..’, ‘त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचीही तयारी’; ठाकरेंचा हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Farmers Protest Against Modi Government: पंजाबमधील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देत आजपासून दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे गटाने केंद्रात सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “पंजाबचा शेतकरी दिल्लीकडे निघाला आहे. त्यास दिल्लीच्या सीमेपर्यंत पोहोचू दिले जाईल काय? हाच खरा प्रश्न आहे,” असं उद्धव ठाकरे गटाने म्हटलं आहे. “ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभी आहे तो शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या मात्र त्याच्या ‘माला’वर मालामाल अशी परिस्थिती आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या दुःखाशी काहीच घेणेदेणे नाही

“सरकारचा प्रस्ताव फेटाळून पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले आहे. शेतमालास किमान हमीभाव, कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या आणखी काही मागण्या आहेत, पण मोदींच्या रामराज्यात या मागण्या मान्य होताना दिसत नाहीत. मका, कापूस, उडीद, अरहर अशा मालास हमीभाव कायद्यात आणण्याची तयारी सरकारने दाखवली. तसा लेखी प्रस्ताव दिला, पण संयुक्त किसान मोर्चा व अन्य शेतकरी संघटनांनी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे व 23 शेतमालांवर हमीभाव देण्याचा कायदा मंजूर करावा, अशी मागणी आहे. सरकार याप्रश्नी वेळकाढूपणा करीत आहे व मध्यस्थांकरवी शेतकरी नेत्यांना मनवण्याचा प्रयोग सुरू आहे. पीयूष गोयल, अर्जुन मुंडा वगैरे लोक मध्यस्थी करीत असतील तर त्यात काही अर्थ नाही. गोयल हे तर भांडवलदारांचे हस्तक म्हणूनच मोदी सरकारात बसले आहेत. शेतकऱ्यांच्या दुःखाशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही. जय शहा यांना जितके क्रिकेट कळते तेवढेच गोयल यांना शेतीतले कळत असावे, पण हे असे लोक शेतकऱ्यांशी चर्चा करत असतील तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

मोदी सरकार एकही मागणी मान्य करण्याच्या मानसिकतेत नाही

“शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या जुन्याच आहेत व त्याच जुन्या मागण्यांसाठी ते पुनः पुन्हा आंदोलने करीत आहेत. कर्जमाफी हा मुद्दा आहेच. देशातील मोदीमित्र उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ होतात. काही मोदीमित्र बँकांची कर्जे बुडवून परदेशात पळून गेले, पण शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरण पत्करतोय. वीज पंपन्यांच्या खासगीकरणास शेतकऱ्यांचा विरोध आहे. यापैकी बऱ्याच पंपन्या मोदीमित्र अदानीच चालवत आहेत. पीक विमा योजना सार्वजनिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून लागू व्हावी. 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना मासिक 10 हजार रुपये पेन्शन मिळावे. लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांची हत्या घडवणाऱ्या अजय मिश्रा टेनीला मंत्रिमंडळातून बरखास्त करून त्याच्यावर खटला चालवावा, अशा काही मागण्या आहेत व त्यावर सरकार बोलायला तयार नाही. 2020 मध्ये दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 11 महिने आंदोलन केले होते. त्यात साडेसातशे शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. या मृत शेतकऱ्यांच्या घरातील किमान एकाला सरकारी नोकरीत घ्यावे, हीसुद्धा आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. यापैकी एकही मागणी मान्य करण्याच्या मानसिकतेत मोदींचे सरकार दिसत नाही,” अशी टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हमीभावाचा प्रश्न देशव्यापी

“मोदी शेतकऱ्यांच्या घरात माणशी पाच किलो धान्य सध्या फुकटात देत आहेत. ही एक प्रकारे गुलामी आहे. नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही. पाच किलो धान्य घ्या व त्याच फुकटेगिरीत मोदींचे भजन करा. हेच रामराज्य सध्या सुरू आहे, पण पंजाबचा स्वाभिमानी शेतकरी ही गुलामी स्वीकारायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ठिणगी पंजाबात पडली असली तरी त्याचा भडका इतर राज्यांत उडू शकतो. कारण हमीभावाचा प्रश्न देशव्यापी आहे. पंजाबचा शेतकरी दिल्लीकडे निघाला आहे. त्यास दिल्लीच्या सीमेपर्यंत पोहोचू दिले जाईल काय? हाच खरा प्रश्न आहे,” असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचीही तयारी

“शेतकरी या वेळीही पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. किमान 6 महिने पुरेल इतके धान्य त्यांनी बरोबर घेतले आहे. लंगर-पाणी, वैद्यकीय सुविधा, तंबू, शिवाय मोर्चाच्या अग्रभागी राहणाऱ्या तरुणांच्या स्वतंत्र ‘टीम’ची व्यवस्था केली आहे. आंदोलकांचे हौसले बुलंद आहेत व सरकारशी प्रसंगी दोन हात करण्याची त्यांची तयारी आहे, पण शेवटी रामराज्यातील रावण हा उद्रेक सहन करतील काय? शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पंजाबच्या आसपासचा 50 किलोमीटर इलाखा सील केला आहे. हरयाणात भाजपचे राज्य आहे व तेथील सरकारने त्या राज्याच्या सीमेवर पोलीस, अर्धसैनिक बल, सशस्त्र बटालियन तैनात केल्या आहेत. प्रसंगी पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याचीही त्यांची तयारी दिसते,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या मात्र त्याच्या ‘माला’वर मालामाल

“हरयाणातील सर्व वाहने, जेसीबी व्रेन जप्त करण्यात येत आहेत. जणू काही देशात युद्धच सुरू झाले आहे. ही इतकी तयारी व जोश चीनच्या सीमेवर दाखवला असता तर लडाखमध्ये चिनी सैन्य घुसले नसते, पण मोदी सरकारने शेतकऱ्यांना शत्रू ठरवले आहे व चिनी कंपन्यांकडून भाजपच्या खात्यात ‘इलेक्टोरल बॉण्डस्’च्या माध्यमातून पैसा पोहोचला आहे. भाजप गेल्या दहा वर्षांत मालामाल झाला. मोदींच्या उद्योगपती मित्रांना अधिक श्रीमंत होण्याची गॅरंटी मिळाली, पण शेतकऱ्यांच्या मालास हमीभावाची गॅरंटी देण्यास सरकार तयार नाही; कारण मोदी काळात देशाची अर्थव्यवस्था कोसळून पडली आहे. सरकारने शेतकऱ्यांची हमीभाव गॅरंटी मागणी मान्य केली तर 10 लाख कोटींचा आर्थिक बोजा वाढेल. हा आकडा मोठा आहे, पण गेल्या दहा वर्षांत मोदींनी केलेला वायफळ खर्च, उधळपट्टी, भ्रष्टाचाराच्या तुलनेत शेतकऱ्यांसाठीचा हा आकडा काहीच नाही. 2022-23 मध्ये 1 हजार 62 लाख 69 हजार टन धान्य ‘एमएसपी’ म्हणजे हमीभावाने खरेदी केले व त्यासाठी 2 लाख 28 हजार कोटी रुपये लागले. आता शेतकऱ्यांची संपूर्ण हमीभावाची मागणी मान्य केली तर आणखी 2 लाख कोटी जादा खर्च येईल. आज देशातील शेतकऱ्यांचे सरासरी मासिक उत्पन्न 10,218 रुपये आहे. यात शेतीशिवाय इतरही कमाईची साधने सामील आहेत. शेतकरी सध्या 32 कोटी टन धान्याचे उत्पादन करतोय. 34 कोटी टन फळे-भाज्यांचे उत्पादन करतोय. तरीही शेतीतून तो सरासरी रोज फक्त 27 रुपयांचीच कमाई करतोय. ज्या देशाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर उभी आहे तो शेतकरी भिकारी आणि कॉर्पोरेट कंपन्या मात्र त्याच्या ‘माला’वर मालामाल अशी परिस्थिती आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभारले, पण…

“मोदींना शेतकऱ्यांची मते हवीत, पण ते शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव देत नाहीत. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभारले, पण रामनाम गाताना स्वाभिमानाची डाळ-रोटीदेखील हवी. मात्र त्याची वानवा आहे. म्हणूनच शेतकरी दिल्लीकडे कूच करीत आहे. शेतकरी आता पुढे निघाले आहेत. देशातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मागे उभे राहायलाच हवे,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.

Related posts